३० जून २०१७ ची मध्यरात्र ही देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्यादृष्टीने काळरात्र ठरेल, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. आज (शुक्रवार) मध्यरात्री बरोबर बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भव्य सोहळ्यात जीएसटीचा शुभारंभ होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ. सिंग, एच.डी. देवेगौडा यांच्यासह देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना, खासदारांना, राज्याराज्यांच्या अर्थमंत्र्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. हा सोहळा पक्षातीत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटलींनी वारंवार निक्षून सांगितले असले, तरी घिसाडघाईच्या अंमलबजावणीचे कारण देऊन तृणमूलच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या डाव्या पक्षांनी मध्यरात्रीच्या या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीवर जोरदार टीका केली. आजची मध्यरात्र ही देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्यादृष्टीने  काळरात्र ठरेल. त्यामुळे देशात इनस्पेक्टर राज पुन्हा परतेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच जीएसटी कायद्यातील एखाद्याला अटक करण्याचे कलम सरकारी धोरणांना विरोध करणाऱ्या उद्योगपतींचा विरोध दाबण्यासाठी असल्याचा आरोप ममता यांनी केला. सध्या देशात सरकारला विरोध करणाऱ्यांना निष्ठुरपणे चिरडून टाकणारे वातावरण अस्तित्त्वा आहे. त्याची मला खूप चिंता वाटते, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

देशाच्या इतिहासात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री सोहळा आयोजित करण्याचा हा चौथा प्रसंग आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी पहिला सोहळा झाला होता. तेव्हा पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी केलेले नियतीशी करार हे भाषण सर्वार्थाने गाजले होते. त्यानंतर १९७२मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव प्रसंगी आणि १९९७मध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्रीचे सोहळे झाले होते.