अटल बिहारी वाजपेयी हे लोकप्रिय राजकारणी होतेच. शिवाय एक संवेदनशील कवी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्याचबरोबर ते उत्तम स्वयंपाकही बनवत. त्यांना विविध ठिकाणी फिरायला जाणे खूप आवडायचे. दु:ख भावना मांडणारी गाणीही ऐकायचे. एका मुलाखतीत त्यांनीच ही माहिती दिली होती. कवितांशिवाय फिरायला जाणे, समुद्र किनारा, हिमाचल येथील पर्वतरांगा मला आकर्षित करतात. मी चांगला स्वयंपाक करतो. खिचडी, हलवा खीर मी अत्यंत उत्तम बनवू शकतो. यासाठी मी खास वेळ काढतो, असे त्यांनी ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. शास्त्रीय आणि आधुनिक दोन्ही प्रकारचे संगीत मी ऐकतो. दु:ख भावना मांडणारी गाणी ऐकतो, असेही ते म्हणाले. देशाचे अपयश हे आपले अपयश आहे, असे वाजपेयी मानत. आपला देश दक्षिण आशियातील प्रगत राष्ट्राच्या रांगेत असला पाहिजे, असे ते म्हणत. ते कधी-कधी निराशही होत. एकदा ते संसदीय जीवनाला कंटाळले होते. मी नेता नसतो तर पत्रकार झालो असतो, असे त्यांनी म्हटले होते.