शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केलं. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांना तुमचं कौतुक होतं. शिवसैनिक लढवैया होता आणि आहे. तुमचं पुन्हा एखदा शिवसेनेत स्वागत करतोय,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसंच पक्षप्रवेशानंतर भास्कर जाधव यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे कोणाशीही वाद नाहीत किंवा कोणावरही आरोपही नाहीत. मी मूळचा शिवसैनिक आहे. पूर्वी जे झालं ते झालं. माझा मूळ स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो आहे,” असं ते यावेळी म्हणाले. तसंच “जी गोष्ट मी कधी केली नाही त्याचा मी कधी खुलासा करत नाही. ज्यावेळी मी शिवसेना सोडली मी मिलिंद नार्वेकर यांच्यावरमुळे शिवसेना सोडली असं म्हटलं नाही. मी कधीही त्यांच्यावर आरोप केला नाही,” असं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

भास्कर जाधव यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भास्कर जाधव चार्टड विमानानं औरंगाबादला पोहोचले होते.