बिहार निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत. दरम्यान आता राजदने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “बिहार निवडणूक सुरु असताना राहुल गांधी शिमला या ठिकाणी गेले होते. पिकनिकचा आनंद लुटत होते. पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला मदतच होते आहे” असा आरोप शिवानंद तिवारी यांनी केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या. राहुल गांधींनी फारशा सभाही घेतल्या नाहीत तसंच राहुल गांधी हे बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले होते. प्रियंका गांधी तर बिहारमध्ये फिरकल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही असंही शिवानंद तिवारी म्हणाले.

राहुल गांधी यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीत कपिल सिब्बल, शशी थरुर, मुकुल वासनिक, मनिष तिवारी हे सगळे ज्येष्ठ नेते होते. हे सगळे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. पण राहुल गांधी हे बिहार निवडणुकीच्या वेळी पिकनिकला गेले होते. पक्ष चालवण्याची ही कोणती पद्धत आहे? काँग्रेसचा कारभार ज्या प्रकारे सुरु आहे आणि ज्या प्रकारे राहुल गांधी वागत आहेत त्याचा फायदा हा भाजपालाच होतो आहे असंही शिवानंद तिवारी यांनी म्हटलं आहे.