“बौद्धधर्मीय म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमानांविरुद्ध चालू केलेल्या लष्करी कारवाईने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटते; पण याच रोहिंग्यांनी बौद्धांच्या केलेल्या कत्तली आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात रोहिंग्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटाने आंबेडकरांना का अस्वस्थ वाटले नव्हते?”, असा सवाल करणारी घणाघाती टीका भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी केली. मानवतावादी दृष्टिकोनातून रोहिंग्यांना भारताने आश्रय देण्याची मागणी आंबेडकरांनी नुकतीच केली होती. त्याला साबळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. म्यानमारमध्ये बौद्धांच्याच कत्तली होत असताना आंबेडकरांनी कधी आवाज उठविला नाही. रोहिंग्यांच्या समर्थनासाठी रझा अकादमीने मुंबईत काढलेल्या मोर्चामध्ये थेट पोलिसांवरच हल्लाबोल केला, तेव्हा आंबेडकर गुळण्या धरून बसले होते. ‘रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायजेशन’ या कुख्यात संघटनेच्या दहशतवादी कारवायांकडे आणि त्यांचे समर्थन करणारया ‘हिब्ज-ए- इस्लामी’, ‘जमात –ए-इस्लामी’, ‘हरकत-उल-जिहाद’सारख्या दहशतवादी संघटनांकडे आंबेडकरांनी कानाडोळा केला. पण बौद्धांचा संयम संपल्यानंतर मात्र आंबेडकरांना रोहिंग्यांची दया येते. हा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार आहे. त्यांनी किमान देशाची सुरक्षितता तरी लक्षात घ्यायला पाहिजे,” अशी तोफ साबळेंनी डागली. “स्वातंत्र्यानंतर भारतीय मुस्लिमांची फक्त मतपेढी म्हणून वापर झाला. त्यांच्या दयनीय अवस्थेचे चित्र माजी न्यायमूर्ती सच्चर यांच्या अहवालातून उमटलेले आहे. सबका साथ, सबका विकास असे सांगत नरेंद्र मोदी अल्पसंख्यकांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. पण जगाने नाकारलेल्या रोहिंग्यांना भारतीय मुस्लिमांच्या तोंडातील घास देण्याचा हा प्रकार आहे,” अशी टीका करून ते म्हणाले, "सर्वप्रथम भारतीय अन् अखेरपर्यंत भारतीय असण्याचा देशभक्त विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडून भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांच्या निर्णयाचा अर्थ ध्यानात घेऊन प्रकाश आंबेडकरांनी रोहिंग्यांचा पुळका सोडावा. त्यांची भलामण करण्याऐवजी त्यांनी भारतातील दलित आणि मुस्लिमांच्या कल्याणाचा विचार केल्यास बरे होईल."