या वर्षी होणाऱ्या बिहारमधील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबतचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे पक्षप्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार मोदी, नंदकिशोर यादव, प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे असे अनेक नेते असल्याचे त्यांनी मान्य केले. याखेरीज बिहारमधील केंद्रीय मंत्र्यांनादेखील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून घोषित केले जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये विजय मिळवणे हे पक्षापुढे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यांतील जनतेचा कौल भाजपच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला. नितीशकुमार यांच्या सरकारला लालूप्रसाद यादव यांनी पाठिंबा दिल्याने लोकांमध्ये संताप असल्याचे शहानवाझ यांनी सांगितले. बिहारमधील परिस्थितीबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा यांना माहिती देणार आहे. तसेच २३५ पैकी १८५ जागा जिंकण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने जनतेला भेडसावणाऱ्या मुद्दय़ांवर देशहितामध्ये निर्णय घेतल्याचा दावाही हुसेन यांनी केला.‘शेतकऱ्यांचे हित जपले’भूसंपादन विधेयकावरून विरोधक जरी सरकारवर टीका करत असले तरी या विधेयकाद्वारे शेतकऱ्यांचे हित जपल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांना एक इंच जमीनही आम्ही बळकावू देणार नाही असे त्यांनी सांगितले. काळ्या पैशाच्या मुद्दय़ावर आम्ही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारसारखे स्वस्थ न बसता विशेष चौकशी पथकाची सरकारने स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. भाववाढ रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचा दावाही शाहनवाझ यांनी केला.