प्रेमामध्ये फसवणूक झाल्याने निराश झालेल्या एका बी. एडच्या विद्यार्थ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील सुमित भाटी या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुमितने त्याच्या गर्लफ्रेण्डला पाच पानांचे लांबलचक पत्र लिहिलं आहे. या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सुमितने तान्या नावाच्या नावाचा उल्लेख केला आहे. तान्याने फसवणूक केल्याने आपण जग सोडून जात आहोत असंही सुमितने पत्रामध्ये लिहिलं आहे. हा विद्यार्थी मूळचा संभल येथील राहणार होता. तो मझोला पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कांशीराम नगर कॉलीनीमध्ये एकटा भाड्याने राहत होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्यचे नेटवर्क १८ हिंदीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सुमितच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे आणि कांशीराम नगर कॉलीनीमध्ये राहणाऱ्या तान्याचे प्रेमसंबंध होते. सुमित मागील चार वर्षांपासून येथे राहत होता. तो एका खासगी क्लासमध्ये शिक्षक होता. सुमितने आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये तान्याने आपली फसवणूक केली आणि ती आता आपल्याशी बोलत नसल्याचे नमूद केलं आहे. समाजव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या विरोधामुळे आमच्या दोघांचे प्रेम यशस्वी होऊ शकत नाही. तिच्या घरच्यांचा आमच्या नात्याला विरोध असल्याने तिने माझ्याशी बोलणं बंद केलं आहे, असं सुमितने चिठ्ठीमध्ये नमूद केलं आहे.

सुमितच्या मृत्यूसाठी तान्या जबाबदार असल्याचा आरोप सुमितच्या कुटुंबियांनी केला आहे. तान्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुमितच्या कुटुंबियांनी केली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक अमित आनंद यांनी चौकशीदरम्यान आम्हाला सुमितच्या प्रेमप्रकरणासंदर्भात माहिती मिळ्याचं सांगितलं आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचेही आनंद यांनी सांगितलं आहे.