MTNL आणि BSNL या सरकारी टेलिकॉम कंपन्यांच्या विलिनिकरणाचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अडचणीत असलेल्या या दोन्ही कंपन्या बंद होणार नाहीत, असे स्पष्टीकरणही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

प्रसाद म्हणाले, MTNL किंवा BSNL या सरकारी कंपन्या बंद होणार नाहीत किंवा त्यांच्यातील गुंतवणूकही कमी केली जाणार नाही. तसेच इतर कोणत्याही तिसऱ्या कंपनीला यामध्ये सामावून घेतले जाणार नाही.

आणखी वाचा- शेतकऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट; शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ

दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत MTNL आणि BSNL या कंपन्यांच्या पुनरुज्जीवन योजनेला तसेच त्यांच्या विलिनिकरणाला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे यापुढे MTNL ही BSNLची सहाय्यक कंपनी म्हणून काम करेल. मात्र, या दोन्ही कंपन्यांच्या विलिनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.  तसेच सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपन्यांना 4G स्पेक्ट्रमचे वाटप करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली असून या दोन्ही कंपन्यांमधील मनुष्यबळ कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीचे आकर्षक पॅकेजही जाहीर करण्यात आल्याचीही घोषणा त्यांनी केली.