राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक आहे, सध्या देशात मजुरांची जी काही अवस्था झाली आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे अशी टीका बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. १६ मे रोजी राहुल गांधी यांनी काही मजुरांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यासंदर्भातल्या व्हिडीओवर मायावतींनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मजुरांच्या ज्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवरच आता मायावतींनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या आहेत मायावती?
” सध्या देशातल्या स्थलांतरित मजुरांची जी अवस्था आहे, जी दुर्दशा झाली त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. आजच्या घडीला करोनाच्या संकटात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक हाल सहन करावे लागत आहेत. याला खऱ्या अर्थाने कुणी जबाबदार असेल तर काँग्रेस. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या कालावधीसाठी देशात काँग्रेसची सत्ता होती. एवढ्या मोठ्या शासनकाळात जर काँग्रेसने या मजुरांच्या अन्न, वस्त्र निवारा या गरजा सोडवल्या असत्या तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती” या आशयाचं ट्विट मायावतींनी केलं आहे.

आणखी वाचा- “आरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…;” चिदंबरम यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांसोबत चर्चा करतानाचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र हा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक आहे. श्रमिकांचा पुळका आला आहे असं काँग्रेस नेते दाखवत आहेत. मात्र काँग्रेसने हे सांगायला हवं की लोकांची भेट घेतली तेव्हा त्यांना नेमकी किती आणि कशी मदत केली. असंही मायावती यांनी सुनावलं आहे. तसंच ज्या मजुरांना आत्ता घरापर्यंत पोहचण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्यांना बसपाच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावं असंही आवाहन मायावती यांनी केलं आहे.