नवी दिल्ली : जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-२ हे शुक्रवारी उत्तररात्री दीड वाजल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी अगदी जवळून (लंब रेषेत केवळ ३५ किलोमीटरवरून) मार्गक्रमण करणार आहे.

ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हर असे तीन भागांचे चांद्रयान-२ असून त्याचा लॅण्डर मोडय़ुल विक्रम हा मुख्य यानापासून वेगळा झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याचे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा १५ मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे.

पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास २१ हजार ६०० कि.मी. असा आहे. त्यानंतर १५ मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद राहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे. चांद्रयान-२चा आतापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. पाच महिन्यांपूर्वी इस्राएलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता, कारण त्यांच्या यानाचा वेग पुरेसा मंदावला नसल्याने ते कोसळले होते.