मागील काही दिवसांपासून देशात रोज अडीच लाखांहून अधिक करोनाबाधित आढळत आहेत. या पाश्र्वाभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८.४५ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील करोनास्थिती, लसीकरण मोहीम आणि अन्य उपाययोजनांबाबत भाष्य केले. मात्र या भाषाणामध्ये पंतप्रधानांकडून काही ठोस माहिती देण्यात आली नाही अशी टीका होऊ लागली आहे. छत्तीसगडमधील मंत्री असणाऱ्या टीएस सिंघ देव यांनीही एएनआयशी बोलताना पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधताना लस निर्मितीची संदर्भातील आकडेवारी सादर करतानाच देशातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा करणं अपेक्षित होतं, असं मत व्यक्त केलं आहे.

“मला अपेक्षा होती की पंतप्रधान आपल्या संबोधनामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा करतील. मात्र लस निर्मितीची क्षमता कशी वाढवली जाणार आहे किंवा त्यानंतर राज्यांना किती प्रमाणात लसींचा पुरवठा केला जाणार आहे यासंदर्भात ते महिती देतील असं वाटलं होतं,” असं देव यांनी म्हटलं आहे.

“पंतप्रधानांनी आवश्यक आकडेवारी देशवासियांसमोर मांडणं गरजेचं होतं. यामध्ये व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड्स यासारख्या गोष्टींची माहिती दिली असती तर राज्यांना अधिक धीर मिळाला असता.  रेमडेसिवीरचा पुरवठा, त्याचा होणारा काळाबाजार यासंदर्भात ते शब्दही बोलले नाहीत. पुरक प्रमाणात राज्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील याबद्दलही त्यांनी काही भाष्य केलं नाही,” अशा शब्दात देव यांनी नाराजी व्यक्त केली.

देशभरात करोना वेगाने फैलावत असून, संपूर्ण देश करोनाशी पूर्ण ताकदीने लढत आहे. मात्र, राज्यांनी लॉकडाउन टाळण्याचा प्रयत्न करावा. अखेरचा उपाय म्हणून लॉकडाउनकडे पाहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांना दिलाय. स्थलांतरित मजुरांनाही आश्वस्त करण्याचे आवाहन मोदींनी राज्यांना केले.

‘देश करोनाशी मोठी लढाई लढत आहे. गेल्या वर्षाअखेर परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, दुसरी लाट मोठी असून, सरकार तिचा पूर्ण सामर्थ्याने सामना करत आहे. आव्हान मोठे असले तरी निर्धार, धाडस आणि तयारीने संकटावर मात केली पाहिजे’, असे सांगत मोदी यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे दाखले दिले. करोनायोद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील अन्य कर्मचाऱ्यांबद्दही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.