मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचाच हात होता, ही वस्तुस्थिती चीनने पहिल्यांदाच सार्वजनिकपणे स्वीकारली आहे. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे आंधळे समर्थन करणे आंतरराष्ट्रीय पातळीवर महागात पडू शकते, हे दिसू लागल्यानेच चीनने या वस्तुस्थितीचा जाहीरपणे स्वीकार केल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. चीनमधील राष्ट्रीय वाहिनीवरून प्रदर्शित झालेल्या एका माहितीपटामध्ये मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानातील 'लष्करे तैय्यबा'चा हात असल्याचे दाखविण्यात आले. हा हल्ला इतका क्रूर आणि भयानक होता की त्यामुळे संपूर्ण जग हादरल्याचे चीनने या माहितीपटामध्ये दाखवले. या माहितीपटाच्या माध्यमातूनच या हल्ल्यांमागे पाकिस्तान असल्याचे चीनने पहिल्यांदाच मान्य केले. चीनच्या या बदलत्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दहशतवादाशी संबंधित विषयांवर पाकिस्तानवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचीच प्रतिमा मलिन होऊ शकते. जागतिक महासत्तेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चीनला यामुळे फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यानेच सर्व देशांनी मिळून दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे, या विचाराला चीननेही पाठिंबा दिल्याचे यातून दिसत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.