बीजिंग : पाकिस्तानची मदत करणाऱ्या चीनच्या वस्तुंवर भारतात बंदी घाला, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहे. भारतीयांच्या या भूमिकेची चीनने खिल्ली उडवली आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारतीयाच्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

भारतातले उत्पादन क्षेत्र अजूनही अविकसित आहे. त्यांच्यात आमच्याशी मुकाबला करण्याची क्षमता नाही. त्यामुळे चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची हिंमत भारतात नाही, असे या वृत्तपत्रात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. व्हिटो पावरचा वापर करुन चीनने मसूद अजहरचा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर चिनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतीयांकडून होत होती. ग्लोबल टाइम्समध्ये ब्लॉगमध्ये लिहिलेल्या मजकूरावर भारतीय लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. काहींनी तात्काळ मेड इन चायना उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे अपिल केले आहे.

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना चीनने खीळ घातल्यानंतर ‘बायकॉट चायनीज प्रॉडक्ट’ हे हॅशटॅग खूप व्हायरल झाले होते. या हॅशटॅगच्या माध्यमातून चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र, एवढ्या वर्षांत तुम्ही चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकू शकला नाहीत. कारण भारत स्वत: ही उत्पादने तयार करु शकत नाही.

भारताला आवडले काय किंवा नाही आवडले काय, त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आमच्या वस्तुंचा वापर त्यांना करावाच लागेल. भारत हा उत्पादन क्षेत्रात अविकसित असल्याने आमच्या वस्तु वापरण्याशिवाय भारताला पर्याय नाही, असेही या वृत्तपत्रात म्हटले आहे.