भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये सोमवारी हिंसक चकमक झाली. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. राष्ट्रीय लोक दलचे नेते जयंत चौधरी यांनी या हिंसक चकमकीबद्दल टि्वट करुन माहिती दिली.

सोराम गावात भाजपा नेते आणि शेतकऱ्यांमध्ये हा हिंसक संघर्ष झाला. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडत नसाल, तर निदान वर्तन तरी चांगले ठेवा. शेतकऱ्यांचा आदर करा. सरकारी प्रतिनिधी दडपशाही पद्धतीने शेतकऱ्यांना नव्या कृषी कायद्याचे फायदे समजावून सांगत असतील, तर ते गावकरी सहन करतील का? असे टि्वटमध्ये म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोराम गावात ही घटना घडली. याआधी २० फेब्रुवारीला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुझफ्फरनगर जिल्ह्यात जनसभेला संबोधित केले होते. मागच्यावर्षी पासून शेतकरी दिल्ली सीमेवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांपर्यंत हे आंदोलन आता पोहोचले आहे.

मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यात कृषी कायद्यांविरोधात महापंचायती आयोजित करण्यात आल्या होत्या. पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत आंदोलनाचे लोण पसरल्याने भाजपाची सुद्धा चिंता वाढली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत ४० जागांवर भाजपाला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय पातळीवरुन, शेतकऱ्यांचा रोष शांत करण्याचे स्थानिक नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.