विजयवर्गीय यांच्या वक्तव्याने खळबळ लिझ मॅथ्यू, मिलिदं घटवाई भोपाळ/ नवी दिल्ली : माझ्या घरात कामासाठी आलेल्या बांधकाम कामगारांना मी भरपूर पोहे खाताना बघितले, ते पोळी खात नाहीत त्यामुळे ते बांगलादेशीच असावेत, असा निष्कर्ष आपण त्यातून काढला असे वक्तव्य भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नागरिकत्व कायदा समर्थन मेळाव्यात केले. ते पोळी खात नव्हते व भरपूर पोहे खात होते या मुद्दय़ांवरून विजयवर्गीय यांनी ते बांगलादेशी असल्याचा अंदाज बांधला त्यावरून देशपातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून काँग्रेसने म्हटले आहे की, विजयवर्गीय यांच्या वक्तव्यातून भाजपप्रणीत एनडीए सरकार एनपीआर म्हणजे लोकसंख्या नोंदणी कशा पद्धतीने राबवेल याची झलकच दिसून आली आहे. धर्म, भाषा, समुदाय व खाण्याच्या सवयी यावरून लोकांची ओळख पटवली जाईल असाच याचा अर्थ होतो. विजयवर्गीय यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेसला’ सांगितले की, इंदोर येथे आपण जे वक्तव्य केले होते त्याचा विरोधकांनी विपर्यास केला असून शरणार्थी व घुसखोर यांच्यातील भेद दाखवण्यासाठी आपण जी उदाहरणे दिली त्यांचा हा चुकीचा अर्थ लावला गेला. विजयवर्गीय यांनी प्रत्यक्षात असे म्हटले होते की, ते लोक पोळी खात नाहीत, ते हिंदी बोलत नाहीत त्यांना हिंदूी समजत नाही. ते कुठल्या जिल्ह्य़ातील आहेत हे सांगू शकत नाहीत ते कुठल्या जिल्ह्य़ातील आहेत हे त्यांनी सांगितले असते तर मी समजू शकलो असतो कारण मला पश्चिम बंगालची बारीक माहिती आहे, पण त्या कामगारांना अशी माहिती नव्हती. काँग्रेस नेत्या सुषमा देव यांनी सांगितले की, विजयवर्गीय हे लोकांच्या मनात भीती निर्माण करीत आहेत. जर भाजपचा जबाबदार नेता अशी विधाने करीत असेल, पोहे खाण्याच्या निकषावरून कुणाला परदेशी, घुसखोर ठरवत असेल तर अवघड आहे. जर तुम्ही व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा संबंध देशाच्या सुरक्षेशी लावला तर ते चुकीचे आहे त्यामुळेच सरकार लोकसंख्या नोंदणी करीत आहे. विजयवर्गीय यांच्या मते शरणार्थी व घुसखोर यांची देशातील संख्या २ कोटी आहे तर बंगालमध्ये त्यांची संख्या १ कोटी आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी सांगितले की, सगळ्यांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे.