माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ति यांनी देशाच्या जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नारायण मूर्ति यांच्या वक्तव्याच्या एका वृत्ताचा हवाला देत “मोदी है तो मुमकिन है” असं म्हणत उपहासात्मक टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे अर्थव्यवस्थेवरून सतत केंद्र सरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेच्या कंझ्युमर कॉन्फिडन्स सर्वेक्षणाचा हवाला देत अर्थव्यवस्था आणि रोजगाराची स्थितीबाबत अधिक वाईट वृत्त समोर येणार असल्याचं म्हटलं होतं. लोकांमध्ये भय आणि असुरक्षिततेची भावना सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. तर लोकांचा विश्वास आतापर्यंतच्या सर्वात खालील स्तरावर पोहोचला असल्याचं ते म्हणाले. नारायण मूर्ति यांनी बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

१९४७ नंतरची जीडीपीमध्ये सर्वात मोठी घसरण

“करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत १९४७ नंतरची सर्वात मोठी घसरण असेल. अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर रूळावर आणलं पाहिजे. तसंच स्वातंत्र्यानंतरची जीडीपीमध्ये सर्वात मोठी घसरण दिसू शकेल,” असंही ते म्हणाले होते.

नारायण मूर्ती यांनी अशी नवी प्रणाली विकसित करण्यावर भर दिला ज्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाला पूर्ण क्षमतेने काम करण्याची मुभा दिली गेली आहे. “जागतिक जीडीपी कमी झाली आहे. जागतिक व्यापार बुडत आहे, जागतिक प्रवास जवळजवळ पूर्णपणे ठप्प आहे, अशा परिस्थितीत जागतिक जीडीपीमध्ये ५ ते १० टक्क्यांची घसरणं होणं अपेक्षित आहे,” असं ते कोरोना विषाणुच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज घेऊन म्हणाले होते.