पाकिस्तानी मंत्र्याने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर, भाजपने शुक्रवारी काँग्रेसवर टीकेचा भडिमार करत, काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

पुलवामा हल्ल्यात केंद्रीय पोलीस राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले होते. हा हल्ल्याला काँग्रेस व इतर पक्षांनी ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी मंत्र्यानेच हल्ल्याची कबुली दिली असल्याने काँग्रेसने भाजपवर केलेला आरोप खोटा ठरतो. त्यामुळे पक्षाने देशाची माफी मागितली पाहिजे, असे ट्वीट केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधले. राहुल यांचा भारतीय गोष्टींवर विश्वास नसतो, लष्कर असो वा सरकार वा  नागरिक, ते कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. आता पाकिस्तानी मंत्र्यानेच काय म्हटले ते पाहा. पाकिस्तान त्यांच्यासाठी सर्वाधिक विश्वासू राष्ट्र आहे, अशी टीकाही नड्डा यांनी केली.