यापुढील काळात काँग्रेस पक्षच दलितांचा आधारभूत कणा ठरेल, असा दावा करतानाच बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या दलित समाजातील नेत्यांना मोठे होऊ देत नसल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केली. दलितांच्या प्रगतीसाठी आपण त्यांच्यामागे उभे राहू, असेही प्रतिपादन गांधी यांनी केले.
आज तुम्ही उत्तर प्रदेशातील पाच दलित नेत्यांची नावे विचाराल तर पाचही क्रमांकांवर तुम्हाला मायावती यांचेच नाव दिसेल; परंतु उत्तर प्रदेशातील सर्व पातळ्यांवर, गावांमध्ये दिल्लीतील सर्व विभागांमध्ये अन्य दलित नेत्यांची रांग लागलेली दिसली पाहिजे, असे मत राहुल यांनी व्यक्त केले. लोकसभेत सोमवारी मंजूर झालेल्या अन्नसुरक्षा विधेयकाचाही राहुल गांधी यांनी उल्लेख केला आणि ‘तुम्हाला काँग्रेसवर विश्वास ठेवावा लागेल,’ असे आवाहनही राहुल यांनी केले. उत्तर प्रदेशातील आपल्या दौऱ्यांचा उल्लेख करून त्या राज्यात दलितांप्रति भेदभाव केला जात असल्याचा आरोप गांधी यांनी केला.