भारतात गेल्या २४ तासात ३७ हजार ७२४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून करोनाबाधित रुग्णसंख्या १२ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात सध्या करोनाचे ११ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. यामध्ये ६ लाख ५३ हजार ५० जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेलं असून ४ लाख ११ हजार १३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोबतच गेल्या २४ तासात ६४८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २८ हजार ७३२ इतकी झाली आहे.

भारतात २१ जुलैपर्यंत १ कोटी ४७ लाख करोना चाचण्यात करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. यामध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या ३ लाख ४३ हजार २४३ चाचण्यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्वात जास्त चाचण्या करण्यात आलेल्या असून भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे.

करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
देशभरात जलद प्रतिद्रव नमुना चाचण्यांची संख्या वाढली असल्यानेही प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसते. मात्र, करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

देशातील २३ एप्रिल ते २१ जुल या काळातील करोनाबाधितांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ८.०७ टक्के आहे. एकूण नमुना चाचण्यांपैकी करोनाबाधित नमुन्यांचे प्रमाण म्हणजे करोनाबाधित होण्याचा दर. मंगळवारी हे प्रमाण ११.१४ टक्के होते. गेल्या आठवडय़ात हे प्रमाण १० टक्के होते. दोन आणि चार आठवडय़ांपूर्वी ते अनुक्रमे ९.७ टक्के व ८ टक्के होते. ३० राज्यांमध्ये करोनाबाधित होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

समूह संसर्ग नाही!
जागतिक आरोग्य संघटनेने समूह संसर्गाची ठोस व्याख्या केलेली नाही. मात्र, एखाद्या रुग्णाला कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली असावी याचा शोध घेता येत नाही अशी स्थिती उद्भवण्याला समूह संसर्ग म्हणता येईल. अशी परिस्थिती अजूनही देशात निर्माण झालेली नाही. स्थानिक ठिकाणांमध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला दिसतो, असे भूषण यांनी सांगितले.