देशात करोना व्हायरसच्या वाढत्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. परंतु यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सीआयआयनं केलेल्या एका सर्व्हेक्षणात यामुळे देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. तब्बल २०० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यादरम्यान ऑनालाइन पद्धतीनं सीआयआयनं सर्व्हेक्,ण केलं. ‘CII सीईओ स्नॅप पोल’नुसार देशातील सर्वाधिक कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं समोर आलं आहे. तसंच यामुळेच नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुरू तिमाहित आणि गेल्या तिमाहित बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नात १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशांतर्गत कंपन्यांचं उत्पन्न आणि नफा या दोन्हीमध्ये होत असलेल्या घसणीचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही पडणार असल्याचं सीआयआयकडून सांगण्यात आलं.

रोजगाराकडे पाहिल्यास संबंधित क्षेत्रांमध्ये ५२ टक्के नोकऱ्यांवर गडांतर येऊ शकतं. तर दुसरीकडे लॉकडाउनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ४७ टक्के कंपन्यांमध्ये १५ टक्क्यापेक्षा कमी नोकऱ्यांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. तर ३२ टक्के कंपन्यांमध्ये १५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता सर्व्हेक्षणादरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.