भारतामध्ये करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारपर्यंत एक हजार १३९ भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. तर देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३० वर पोहचला आहे. याच संकटावर मात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वेगवेगळ्या सबलीकरण गटांची (Empower Groups) स्थापना केली आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सामुग्रीचा आणि साधनांचा कसा वापर करता येईल, यासंदर्भात काय तयारी पूर्ण झाली आहे या गोष्टींवर हा गट लक्ष ठेवणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाची रविवारी एक बैठक पार पडली. या बैठकीमध्येच करोनाविषयक ११ गटांची स्थापना करण्यात आली. या ११ वेगवेगळ्या गटांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पहिला गट हा आरोग्य विषयक आप्तकालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी निती आयोगाचे सदस्य असणारे डॉक्टर व्ही पॉल यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

दुसऱ्या गटाकडे देशातील रुग्णालये, अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरण (आयसोलेशन) कक्षांची उपलब्धता तसेच आजाराचा प्रादुर्भाव किती वाढत आहे, चाचण्या आणि आपत्कालीन उपचार केंद्रे यांच्यासंदर्भात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.याचबरोबर आरोग्य उपकरणे, रुग्णांच्या जेवणाची आणि औषधांची सुविधा, खासगी क्षेत्रातील रुग्णालये, मदत करणाऱ्या कंपन्या आणि सेवाभावी संस्थांशी समन्वय ठेवणे, लॉकडाउनसंदर्भातील विषयांकडे लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गटांची स्थापना करण्यात आली आहे.

चीनमधील वुहान येथून करोनाचा विषाणू जगभरातील १८३ देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे जगभरात ३३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा संसर्ग ७ लाखांहून अधिक जणांना झाला आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजारहून अधिक जण पूर्णपणे बरे झाले आहेतअमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील १ लाख ४० हजारहून अधिक जणांना कोरनाचा संसर्ग झाला आहे. एकट्या न्यू यॉर्क शहरामध्ये ५० हजारहून अधिक रुग्ण आहेत. अमेरिकेमध्ये करोनामुळे आतापर्यंत दोन हजार ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे.