वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने दणका दिला आहे. ३१ जुलैपूर्वी कोर्टात प्रत्यक्ष हजर व्हा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल असा निर्वाणीचा इशाराच कोर्टाने बुधवारी दिला. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात यावे यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता.

झाकीर नाईक सध्या भारत सोडून मलेशियात आश्रयाला गेला आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात त्याने भारतात परतण्यासाठी तयारी दर्शवली होती. परंतु यासाठी त्याने एक अटही घातली होती. आपण दोषी ठरत नाही तोवर आपल्याला अटक केली जाणार नसल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले तरच आपण भारतात परतण्यास तयार असल्याचे नाईकने म्हटले होते.

१ जुलै २०१६ रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका कॅफेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचे नाव समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर आरोपही लावले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या त्या हल्ल्यात तब्बल २० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.