सध्याच्या स्थितीत करोना व्हायरसची लागण होणे चिंतेची बाब आहे. या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक जण आपआपल्या पातळीवर काळजी घेत आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्यासारखे उपाय आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आतापर्यंत २३ टक्के लोकांना म्हणजे एक चतुर्थांश लोकाना करोना व्हायरसची लागण झाली आहे.खरंतर इतके लोक करोनाने बाधित होणे चिंतेची बाब असली पाहिजे. पण दिल्लीत तज्ज्ञांच्या मते हे चांगलं लक्षण आहे. तज्ज्ञ असं का म्हणतायत? त्यामागे काय कारण आहे, ते आपण समजून घेऊया.

एनसीडीसीने केलेल्या सिरो सर्वेमधून दिल्लीत २३ टक्के नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. या सिरो सर्वेमध्ये प्रत्येकाच्या शरीरातील रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. संसर्गाविरोधात लढण्यासाठी शरीरात किती प्रमाणात अँटीबॉडीजची निर्मिती झालीय. ते या चाचणीद्वारे तपासण्यात आले. करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजमुळे रुग्ण त्यातून बरा होतो.

आणखी वाचा- Coronavirus: भारतात आतापर्यंत तब्बल १ कोटी ४७ लाख चाचण्या, रुग्णसंख्या १२ लाखांजवळ

दिल्ली सरकारसोबत मिळून एनसीडीसीने हा सिरो सर्वे केला. २७ जून ते १० जुलै दरम्यान एकूण २१,३८७ रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या सर्वेमधून २३ टक्के नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दिल्लीची अंदाजित लोकसंख्या १.९ कोटी आहे. सर्वे रिपोर्टनुसार, २३ टक्के म्हणजे आतापर्यंत ४० लाखा पेक्षा जास्तलोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. लॅबमध्ये केलेल्या चाचणीत  दिल्लीत आतापर्यंत १.२३ लाख नागरिकांचे  करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सिरो सर्वेच्या रिपोर्टमधला आकडा त्यापेक्षा जास्त आहे.

आणखी वाचा- दिलासादायक : करोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येने गाठला उच्चांक

सिरो सर्वेमध्ये अनेकांच्या शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे दिसून आले. म्हणजे त्यांना व्हायरसची बाधा  झाली होती तसेच त्यांच्या शरीरात व्हायरस विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. दिल्लीमध्ये करण्यात आलेले हे सर्वेक्षण भारत हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जात असल्याचे संकेत आहेत असे तज्ज्ञांनी सांगितले.

“लॅब चाचणीतून दिल्लीत आतापर्यंत सहा टक्के लोकांना करोना व्हायरसची बाधा झाल्याचे समोर आले आहे. पण अँटीबॉडीजमुळे एक चतुर्थांश दिल्लीकरांमध्ये नैसर्गिक इम्युनिटी निर्माण झाली आहे. याला हर्ड इम्युनिटी म्हणतात. लसी शिवाय व्हायरस विरोधात लढण्यासाठी त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली” असे डॉक्टर एस.के.सरीन यांनी सांगितले.