शिक्षण व संपन्नता यासोबतच अहंकारही येतो. त्यामुळे हल्लीच्या काळात घटस्फोटाची प्रकरणे ‘सुशिक्षित व संपन्न’ कुटुंबांमध्ये अधिक आढळतात आणि त्याचा परिणाम कुटुंबे दुरावण्यात होतो, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. भारतातील हिंदू समाजाला पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या कुटुंबीयांसह हजर असलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत यांनी हे विचार मांडले.

‘आजकाल घटस्फोटाची प्रकरणे मोठय़ा प्रमाणात वाढली आहेत. लोक किरकोळ कारणांवरून भांडतात. सुशिक्षित व संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात, कारण शिक्षण व संपन्नतेसोबत अहंकार येतो. परिणामी कुटुंबे विभाजित होतात. यामुळे समाजही विभाजित होतो, कारण समाज हेही एक कुटुंब आहे’, असे भागवत म्हणाल्याचे संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘स्वयंसेवक संघात करत असलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे; कारण अनेकदा आम्ही जे करतो त्याची निश्चिती करण्यासाठी कुटुंबातील महिलांना अधिक कष्टप्रद काम करावे लागते’, असेही भागवत म्हणाले.

दोन हजार वर्षांपासून आम्ही पाळत असलेल्या परंपरांमुळे समाजाची आजची अवस्था आली असल्याचे सांगताना भागवत म्हणाले की, आपण महिलांना घरापुरते बंदिस्त ठेवले आहे. दोन हजार वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तो आमच्या समाजाचा सुवर्णकाळ होता.

मी हिंदू आहे. सर्व धर्माशी संबंधित श्रद्धास्थानांचा मी आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानाबाबत मी ठाम आहे. मला माझे संस्कार माझ्या कुटुंबाकडून मिळाले आहेत आणि ते आम्हाला मातृशक्ती शिकवते, याचाही भागवत यांनी यावेळी उल्लेख केला.