देशातील उद्योग व्यावसायांना आर्थिक मंदीच्या झळा पोहोचायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध उद्योगांकडून कामगार कपात केली जात आहे. त्यात आता भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने देखील उत्पादनाला मागणी नसल्याचे सांगत ३००० कंत्राटी कामगारांची कपात केली आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी मंगळवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांशी बोलताना सांगितले की, “कंपनीच्या वाहनांना सध्या मागणी नसल्याने ३००० कामगारांच्या करारांचे यावेळी नुतनीकरण करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर, सुरक्षा मानदंड आणि मोठ्या करांमुळे वाहनांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत.”

देशाच्या नव्या वाहन प्रदुषण नियमावलीनुसार मारुती सुझुकी सध्या वाहन निर्मितीवर भर देत आहे. त्यासाठी कंपनीने सीएनजी आणि हायब्रीड कार्सच्या उत्पादनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन या वर्षात ५० टक्क्यांनी वाढवण्याचे नियोजन सध्या कंपनीकडून सुरु असल्याचेही यावळी भार्गव यांनी सांगितले.

दरम्यान, जुलै महिन्यांत सलग नवव्या महिन्यांत वाहनांच्या विक्रीत घट नोंदवली गेली आहे. अधिकाधिक मोटार वाहन उत्पादक आपल्या कंपन्यांमध्ये कामगार कपात करीत आहेत. तसेच खर्च कमी करण्यासाठी तात्पुरते उत्पादन थांबवण्यात येत असल्याचे रॉयटर्सच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.