पाकिस्तानमध्ये पेशावर येथील शाळेत २०१४ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यास भारताचा पाठिंबा होता, हा पाकिस्तानने केलेला आरोप विपरीत व हास्यास्पद असून त्यामुळे हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुलांच्या स्मृतींचा घृणास्पद अपमान झाला आहे, अशी खरमरीत टीका भारताने पाकिस्तानच्या आरोपावर केली आहे. संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूत इनम गंभीर यांनी भारताचा उत्तराचा अधिकार वापरताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले. त्यांनी पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक आरोपांच्या तर्कसंगत पद्धतीने चिंध्या उडवल्या. चार वर्षांपूर्वी पेशावरमधील शाळेत झालेला हल्ला भयानक होता व त्यात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानने केलेला आरोप हास्यास्पद व विसंगत तसेच संतापजनक आहे. ज्या वेळी २०१४ मध्ये या हल्ल्यात निष्पाप मुले मारली गेली, त्या वेळी भारतातून वेदनेच्याच भावना उमटल्या होत्या, याची आठवण पाकिस्तानातील इमरान खान सरकारने ठेवायला हवी होती, असे सांगून त्या म्हणाल्या, की भारताच्या संसेदत दोन्ही सभागृहांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त केल्या होत्या. पाकिस्ताननेच दहशतवादाचा राक्षस जन्माला घातला असून आता त्यावरून लक्ष उडवण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा वापर करून शेजारी देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कुरेशी यांनी असे सांगितले, की पेशावरमधील हल्ल्यात १५० बालके मारली गेली. त्यासह इतर हल्ल्यात भारताचे समर्थन होते. कुरेशी यांच्या आरोपाचा समाचार घेताना गंभीर म्हणाल्या, की कुरेशी यांनी खान यांच्या नेतृत्वाखालील नवीन पाकिस्तानाचा गाजावाजा सुरू केला आहे. पण भारतीय शिष्टमंडळ हे नवीन परराष्ट्रमंत्र्यांची नव्या पाकिस्तानची दृष्टी काय आहे हे ऐकण्यासाठी आले आहे. आम्ही जो नवीन पाकिस्तान पाहत आहोत, तो जुन्याच मुशीतील आहे. पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय दिल्याचे पुरावे आहेत.