केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुपकार ठरावावरून याच्याशी निगडीत असलेल्या पक्षांसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गुपकार गँग ग्लोबल होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी या बाबतची आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी, असं देखील शाह म्हणाले आहेत. तसेच, गुपकार गँगने देशाचा मूड सांभाळला नाही तर लोक त्यांना बुडवतील, असा इशाराही शाह यांनी दिला आहे.

”गुपकार गँग ग्लोबल होत आहे! त्यांची इच्छा आहे की परदेशी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करावा. गुपकार गँग भारताच्या तिरंगा ध्वजाचाही अपमान करत आहे. सोनिया गांधी राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कृत्यांना पाठिंबा आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. भारतीय लोकं आता यापुढे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात कोणतेही अपवित्र ग्लोबल आघाडी सहन करणार नाहीत.” असं अमित शाह यांनी ट्विट केलं आहे.

तसेच शाह यांनी असा देखील आरोप केला आहे की, ”काँग्रेस व गुपकार गँग जम्मू-काश्मीरला दहशत व अशांततेच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहे. आम्ही कलम ३७० हटवून दलित, महिला आणि आदिवासी लोकांना जे अधिकार दिले आहेत ते हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच त्यांना सर्वत्र लोकांना नाकारलं आहे.

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे व राहील. गुपकार गँगने देशाचा मूड सांभाळला नाही तर लोक त्यांना बुडवतील.” असा देखील अमित शाह यांनी इशारा दिला आहे.

‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’(पीएजीडी) हे नॅशनल कॉन्फरस आणि इतर पक्षाचे मिळून बनलेले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुर्नप्रस्थापित करून राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी पीएजीडीची आहे.

काय आहे गुपकार ठराव –
अनुच्छेद ३७० ला पाठिंबा देण्यासाठी जो बहुपक्षीय निग्रह ४ ऑगस्ट रोजी दाखवण्यात आला, त्या निग्रहाला आणि त्या वेळी झालेल्या ठरावाला गुपकर ठराव असे संबोधले जाते. कारण, नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्षांच्या श्रीनगरमधील गुपकार येथील निवासस्थानी तो संमत झाला होता. यामध्ये सांगण्यात आले आहे की, सर्व पक्षांनी सर्वसंमतीने निर्णय घेतला आहे की , जम्मू-काश्मीरची ओळख, स्वायत्तता आणि त्याचा विशेष दर्जाचे रक्षण करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू.