राफेल डीलमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक होत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा किंवा संरक्षण क्षेत्र हे पंचिंग बॅग किंवा निधीचा स्त्रोत राहिले आहे. एका बाजूला काँग्रेस नेते लष्कर प्रमुखांचे नाव घेतात आणि सर्जिकल स्ट्राइकची खिल्ली उडवतात. दुसऱ्या बाजूला संरक्षण क्षेत्राची लूट करतात.

४०-५० च्या दशकातील जीप घोटाळयापासून ८० च्या दशकात बोफोर्स त्यानंतर ऑगस्टा वेस्टलँड, पाणबुडी घोटाळा आणि असे अनेक घोटाळे काँग्रेसने केल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या सैन्य दलाचे मनोधैर्य खच्ची झाले तरी चालेल पण हे त्यांचे पैसे बनवण्याचे मार्ग आहेत. पण आता ते दिवस राहिले नाहीत असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील बूथ स्तरीय कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात बोलताना असताना ही टीका केली. मागच्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली लष्कराची वन रँक, वन पेन्शनची मागणी आपल्या सरकारने पूर्ण केली. आधीच्या सरकारने ओआरओपीसाठी फक्त ५०० कोटी रुपये बाजूला काढले होते ती एक क्रूर थट्टा होती असे मोदी म्हणाले.