भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेली लक्ष्यभेदी कारवाई दडविण्याचा पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला तरीही सत्य उजेडात आल्याशिवाय राहणार नाही, असे भारताने म्हटले आहे.

भारतीय लष्करावर विशेष कामगिरी सोपविण्यात आली होती आणि त्याचे आवश्यक ते परिणाम दिसून आले आहेत आणि भारताला जो संदेश पोहोचवावयाचा होतो तो पोहोचविण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोणीही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्य उजेडात येईलच, एवढेच आपल्याला म्हणावयाचे आहे, असे स्वरूप यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी लक्ष्यभेदी कारवाईला दुजोरा दिला त्याबाबत स्वरूप बोलत होते.

लक्ष्यभेदी कारवाईबाबतचे व्हिडीओ फुटेज उघड करावयाचे किंवा नाही याचा निर्णय सरकार घेईल, असेही त्यांनी या वेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.