जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर वारंवार बजावून देखील सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन व कुरापती सुरूच ठेवणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून मोठा दणका देण्यात आला आहे. सीमा रेषेवरील पुंछ व राजौरी सेक्टरमध्ये गुरूवारी रात्री उशीरा पाकिस्तानने केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी चोख प्रतित्युत्त दिले. यामध्ये पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले तर अनेक चौक्या देखील उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. लष्करी सुत्रांच्या  हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. याशिवाय एका, स्थानिक महिलेचा देखील मृत्यू झाला होता. या हल्ल्यास भारताकडून चोख प्रतित्त्युतर देण्यात आले होते व पाकिस्तानच्या दोन सैनिकांना ठार केले होते. शिवाय, पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या देखील उद्धवस्त करण्यात आल्या होत्या.

जम्मू-काश्मीर भागातील एलओसीवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ९५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. त्यांनी यावेळी हे देखील सांगितले की, भारतीय जवानांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना वेळोवेळी चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलेले आहे.

भारत सरकारने जम्म-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान अधिकच चिडलेला आहे. परिणामी पाकिस्तानकडून सर्वप्रकारे भारतविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय दहशतवाद्यांना भारताता घुसखोरीसाठी मदत देखील केली जात आहे.