मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ऱ्हास सुरू झाल्याचा म्हणत देशातील वातावरण ‘मुक्त’पासून ते ‘अंशत: मुक्त’ अशा स्थितीपर्यंत घसरले असल्याचं ‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालात म्हणण्यात आलं होतं. वॉशिंग्टनमधील या संस्थेच्या अहवालावर मोदी सरकारने निशाणा साधला आहे. ‘फ्रीडम हाऊस’चा अहवाल चुकीचा व दिशाभूल करणारा आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालात भारतातील स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचं म्हटलं होतं. या अहवालावर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं निवेदन जाहीर करून टीका केली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध पक्षाची सरकारं आहेत. भारतीय संघराज्य व्यवस्था देशात असल्याचं दिसून येतं. मुक्त आणि निर्भय वातावरणात देशात निवडणूका घेतल्या जातात. या निवडणुका स्वायत्त निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘फ्रीडम हाऊस’ अहवाल भारतविरोधी कटाचाच भाग; भाजपा नेत्याचा दावा

जानेवारी २०१९मध्ये दक्षिण दिल्लीतील दंगलीचा संदर्भ देत सरकारनं अहवालावर टीका केली आहे. जानेवारी २०१९मध्ये झालेल्या दंगलीत कायदा व्यवस्थेन निष्पक्ष आणि भेदभाव न करता आपलं काम केलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती कारवाई केली गेली. कायदा आणि प्रक्रियेनुसार सर्व तक्रारी, फोन कॉल कायदा व्यवस्थेकडून कायदेशिर कारवाई करण्यात आली, असं केंद्रानं म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेनं कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे. चर्चा, वादविवाद आणि विरोध भारतीय लोकशाहीचा भाग आहे. केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व देतं. पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी केंद्र सरकारने राज्य व केंद्र शासित प्रदेशांना विशेष सूचना दिलेल्या आहेत, असंही सरकारनं म्हटलं आहे.

काय म्हटलंय अहवालात?

‘फ्रीडम हाऊस’ या संस्थेने मुस्लिमांवरील हल्ले, देशद्रोह कायद्याचा वापर आणि टाळेबंदीसह सरकारचा करोनाविरोधातील लढा यांचा विशेष संदर्भ दिला आहे. सर्वात मुक्त वातावरण असलेल्या देशासाठी एकूण १०० गुण आहेत त्यामध्ये भारताचे गुण ७१ वरून ६७ वर घसरले आहेत. त्याचप्रमाणे २११ देशांमध्ये भारताचे स्थान ८३ वरून ८८ वर घसरले आहे. मोदी यांचे हिंदू राष्ट्रवादी सरकार मानवी हक्क संघटनांवर दबाव वाढवत आहे, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार यांच्यात दहशतीचे वातावरण परसवण्यात येत आहे आणि झुंडबळीसह मुस्लिमांना लक्ष्य करण्यात येणारे धार्मिक हल्ले केले जात आहेत. मोदी हे २०१९ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भारताची घसरण अधिकच झाली.