करोना या महामारीशी सगळं जग सामना करतं आहे. अशात करोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत. असं असलं तरीही करोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. तूर्तास तरी ही शक्यताच आहे मात्र ही एक दुःखद बाबच आम्ही मानतो आहोत. सध्याच्या घडीला जगभरात करोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा जास्त आहेत. अशात करोनामुळे २० लाख मृत्यू जगभरात होऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. रॉयटर्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

माईक रेयान UN एजन्सीच्या इमर्जन्सी प्रोग्रामचे प्रमुख यांनीही ही भीती बोलून दाखवली आहे. करोना व्हायरसची बाधा होऊन मागील ९ महिन्यांमध्ये ९.९३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. यामुळे येत्या काळात लस येण्याआधी ही संख्या दुप्पट होईल म्हणजेच प्रभावी लस येण्याआधी २० लाख मृत्यू होऊ शकतात ही शक्यता अधिक आहे असंही रेयान यांनी म्हटलं आहे.

करोनाची बाधा होऊन आजवर अमेरिकेत २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात ९३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त, रशियात २० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहे तर भारतात ही एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोहचली आहे.

तरुण पिढीला दोष देऊ नका
जगभरात आपण करोनाचं संक्रमण होणारे रुग्ण वाढताना पाहिले. मात्र यासाठी तरुण पिढीला दोष देऊ नका. ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या फक्त तरुणाईमुळे घडल्या आहेत असं नाही. लॉकडाउनची बंधनं शिथील झाल्यानंतर लोकांनी घरांमध्ये ज्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली त्यामुळेही संक्रमण वाढलं असंही रेयान यांनी म्हटलं आहे. फक्त तरुण पिढीला यासाठी दोषी धरणं योग्य नाही असंही ते म्हणाले.