देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा तुकडे-तुकडे गँगचा उल्लेख होऊ लागला आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून सध्या केंद्रात तुकडे-तुकडे गँग सत्तेत आहे असा टोला लगावला आहे. तुषार गांधी यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. यामध्ये त्यांनी "तुकडे-तुकडे गँग सध्या केंद्रात सत्तेत आहे" असं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे. अमित शाह यांनी तुकडे-तुकडे गँगला अद्दल घडवा असं आवाहन गुरुवारी केलं होतं. The Tukde Tukde Gang is currently in power at the Centre. — Tushar (@TusharG) December 27, 2019 काय म्हणाले होते अमित शाह ? अमित शाह यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना तुकडे-तुकडे गँगला अद्दल घडवा असं आवाहन दिल्लीतील जनतेला केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, "काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग दिल्लीत अशांतता पसरवत असून, तिला अद्दल घडवा". ‘‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तुकडे-तुकडे गँग कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे,’’ असे अमित शाह म्हणाले होते.