हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. या चकमकीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवली. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचं राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी हैदाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेलं. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं.

“पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला, तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती आहे,” असं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबर रोजी महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची हत्या करत मृतदेह जाळून देण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती.

मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असं गृहित धरलं तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असंही निकम यांनी सांगितलं.

आणखी वाचा- #HyderabadEncounter : कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला हवी होती : अंजली दमानिया

चकमक करण्याची पद्धत चुकीची – अंजली दमानिया
या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे.

आणखी वाचा- #HyderabadEncounter : नेमके घटनास्थळी काय घडले?

नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं. अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.