हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले. हैदराबाद प्रकरणात आरोपी असणारे चार जण पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला, पण बहुतांश भारतीयांनी पोलिसांचे कौतुक केले. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेदेखील पोलिसांची प्रशंसा केली. त्याचसोबत त्याने हैदराबाद सरकारचेही अभिनंदन केले. "हैदराबाद सरकार आणि पोलीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांनी साऱ्यांना दाखवून दिले की हे असेच व्हायला हवे होते. आता पुन्हा कोणी असं करण्याचं धाडस करणार नाही, असे ट्विट हरभजनने केले. त्याचसोबत त्याने भारत सुरक्षित बनवा (#makeitsafeindia) असा टॅगदेखील दिला आहे. Well done @TelanganaCMO and police for showing this is how it is done no one should dare doing something like this again in future #makeitsafeindia — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 6, 2019 अशी घडली घटना बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना अधिक तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी नेलं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पळून जाऊ नये असा इशारादेखील देण्यात आला, पण ते न थांबल्यानं पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ३ ते ६ दरम्यान ही घटना घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली. संपूर्ण देशात या प्रकरणाबाबत संतापाची लाट होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते, तर पुन्हा अशी घटना घडली असती. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपी मारले गेले आहेत, ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला. पण या प्रकरणातील आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.