हैदराबादमध्ये १८ महिलांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या ४५ वर्षीय सीरिअल किलरला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलांची हत्या करण्याशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. अटकेची कारवाई केल्यानंतर नुकतीच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने गेल्या २४ वर्षात तब्बल १८ महिलांची हत्या केली. हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी मंगळवारी दोम महिलांच्या हत्येप्रकरणी अटक केली असल्याचं जाहीर केलं. संयुक्त मोहीम राबवत आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर आरोपी २१ गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं उघड झालं. यामध्ये १६ हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्हे आणि पोलीस कोठडीतून पळून जाण्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.

वयाच्या २१ व्या वर्षीय आरोपीचं लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- मूलबाळ होत नसल्याने टोमणे मारणाऱ्या सासूची सूनेनं केली हत्या; मृतदेहाचे डोळे फोडले, बोटं कापली

आरोपीने २००३ पासून गुन्हे करण्यास सुरुवात केली. शरीरसुखाच्या बहाण्याने अविवाहित महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढत असे. एकत्रित मद्यप्राशन केल्यानंतर तो त्या महिलेची हत्या करायचा आणि नंतर त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरुन घटनास्थळावरुन पळ काढत असे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

१ जानेवारीला एका व्यक्तीने पत्नी ३० डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्याने ४ जानेवारीला रेल्वे ट्रॅकवर महिलेचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान पीडिता आणि आरोपी एकत्र रिक्षातून प्रवास करत असल्याचं दिसलं होतं. आरोपी महिलेला एका निर्जनस्थळी घेऊन गेला आणि मद्यप्राशन करत हत्या केली. महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता.

आणखी वाचा- धावत्या गाडीमध्ये Sex Racket; चार मुलींसहीत सहा जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २००३ ते २०१९ दरम्यान एकूण १६ हत्या केल्या. २००९ मधील हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षादेखील झाली होती. शिक्षा भोगत असतानाच त्याने जेलमधून पळ काढला होता. यादरम्यान त्याने पाच हत्या केल्या. २०१३ मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.