कोणी मानावं किंवा मानू नये पण पंतप्रधान नरेंद्र मोदीच चॅम्पिअन आहेत. त्यांच्या सरकारने सर्व बाबींकडे लक्ष दिलं आहे. मला वाटतं, शेतकऱ्यांसाठी सध्याच्या सरकार इतकं मोठ काम दुसऱ्या कोणत्याच सरकारनं केलेलं नाही, असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.

राजीव कुमार म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अद्यापपर्यंत एकाही सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या नव्हत्या, त्या या सरकारने स्विकारल्या. सरकारने शेतकऱ्यांसाठी १०.५० लाख कोटींची कर्जे दिली. राहुल गांधींच्या सरकारने त्यांचे काम करावे, इतर पक्ष त्यांची कामे करतील, असा सल्लाही त्यांनी राहुल यांना दिला.

राहुल गांधींनी शेतकरी कर्जमाफीवरुन एक ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटले की, गुजरात आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना गाढ झोपेतून उठवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. मात्र, पंतप्रधान मोदी अद्यापही झोपलेले आहेत. आम्ही त्यांनाही जागं करणार आहोत.