केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही असं पुन्हा एकदा खडसावून सांगितलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ‘भारतीय जग: मोदी सरकारचं परराष्ट्र धोऱण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये वारंवार अडथळा आणणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मत यावेळी सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘आम्हाला दहशतवादावर चर्चा नको आहे, तर कारवाई हवी आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही’.

यावेळी सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने दिलेल्या प्रतिक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘पाकिस्तानी लष्कर जैश-ए-मोहम्मदच्या वतीने आमच्यावर हल्ला का करत आहे ? तुम्ही जैश-ए-मोहम्मदला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवता. जेव्हा पीडित देश याचं उत्तर देतो तेव्हा तुम्ही त्यांच्या वतीने हल्ला करता’, अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.

‘जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अजहरला आमच्याकडे सोपवावं’, अशी मागणी यावेळी सुषमा स्वराज यांनी केली. जर पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवर आश्रय मिळालेल्या दहशतवादी संघनटनांवर कारवाई केली तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारु शकतात असं म्हटलं आहे.