भारताची अर्थव्यवस्था १०.३ टक्क्यांनी घसरणार असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे. करोना व्हायरस आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाउन याचा गंभीर परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा दर १०.३ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.जगाच्या अर्थव्यवस्थेत ४.४ टक्क्यांनी घट होईल. मात्र २०२१ मध्ये हे चित्र बदलेल असंही IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे.

आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने जगातल्या अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये हे सगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. हा अहवाल वर्ल्ड बँकेच्या वार्षिक बैठकीआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सादर केला आहे. २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घसरेल आणि २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांनी वधारेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ५.८ टक्के घसरण होईल असाही अंदाज आहे. तर २०२१ मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ३.९ टक्के वधारेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

माजी भारतीय डिप्लोमॅट सय्यद अकबरद्दीन यांनी IMF ने वर्तवलेल्या अंदाबाबत एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनीही हे म्हटलं आहे की २०२१ हे वर्ष भारतासाठी चांगलं असणार आहे.२०२१ हे वर्ष भारतासाठी २०२० च्या तुलनेत बऱ्यापैकी चांगलं असेल. द वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक २०२० नेही हा अंदाज वर्तवला आहे असंही अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात २०२१ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ८.८ टक्क्यांनी वधारेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला करोना आणि लॉकडाउनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.