भारताला अणुपुरवठादार देशांच्या समूहाचे सदस्यत्व मिळू शकते तर पाकिस्तानला मात्र ही संधी मिळू शकणार नाही असे अमेरिकेच्या शस्त्रास्त्र नियंत्रण महासंघाने (एसीए) म्हटले आहे. अणुपुरवठादार देशांच्या समुहामध्ये नव्या देशांना सामील करुन घेण्यात यावे असा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर एसीएने हे विधान केले आहे. याबरोबरच जर भारतासारख्या देशाला या समूहात सामील करुन घेण्यात आले तर अण्विक प्रसारबंदी कराराचे महत्त्व कमी होईल असा इशाराही त्यांनी दिला. अणुपुरवठादार समुहाचे माजी अध्यक्ष राफेल मारिआनो यांनी मागील आठवड्यामध्ये दोन पानी पानी प्रस्ताव तयार केला. त्यामध्ये त्यांनी अण्विक प्रसारबंदी केलेल्या देशांना कसे या समुहात सामील करुन घेता येईल याविषयी चर्चा केली आहे.पाकिस्तान आणि भारत हे देश देखील या समुहात कसे येऊ शकतील याचा ऊहापोह त्यांनी या प्रस्तावात केला आहे. अणुपुरवठा समुहाच्या देशाचे अध्यक्ष सॉंग यंग वान हे मारिआनो यांचे निकटवर्तीय समजले जातात तेव्हा त्यांच्या या प्रस्तावाला वजन आहे असे माध्यमांचे म्हणणे आहे. जर एखाद्या देशाने अण्वस्त्र प्रसारबंदी कायद्यावर स्वाक्षरी केलेली नसेल तर तो देश अणुपुरवठादार समूहामध्ये दुसऱ्या देशाला न येऊ देण्यासाठी प्रयत्न करू शकणार नाही याचे प्रावधान या करारात हवे असे त्यांनी सुचवले आहे. भारताचे अणुपुरवठादार देशांसोबत व्यावसायिक संबंध आहेत. सध्या या समूहात ४८ देश आहे. भारताने या समुहात सामील होण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला अर्ज केला आहे. त्यानंतर भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही अर्ज केला. अमेरिकेने भारताला या समूहात सामील व्हावे यासाठी पाठिंबा दिलेला आहे तर चीन भारताच्या आड येत आहे.