विश्वासार्ह बातम्यांच्या बाबतीत भारतीय माध्यमांनी ३१ वा क्रमांक पटकावल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. एकूण ४६ नमुन्यांचा अभ्यास केल्यावर ही माहिती समोर आली आहे. रॉयटर्स इन्स्टिट्युटने हे सर्वेक्षण केलं आहे.

रॉयटर्स इन्स्टिट्युट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या या वर्षीच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून काढलेले निष्कर्ष या अहवालामधून जाहीर करण्यात आले आहेत. करोनाच्या काळात करण्यात आलेलं हे सर्वेक्षण बातम्यांच्या विश्वासार्हतेबद्दलचं होतं. यावर्षी प्रथमच या अहवालामध्ये भारताची वर्णी लागली आहे.

या सर्वेक्षणासाठी जेवढ्या लोकांची मतं घेण्यात आली त्यापैकी ७३ टक्के लोक मोबाईलवर बातम्या वाचतात. तर ८२ टक्के लोक सोशल मीडियासह इतर ऑनलाईन स्रोतांच्या माध्यमांतून बातम्या वाचतात. व्हॉटसप आणि युट्यूबसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या वाचणारे ६३ टक्के आहेत.

या अभ्यासासाठी इंग्रजी बोलणारे, ऑनलाईन बातम्या वाचणारे, पाहणारे, तरुण, सुशिक्षित आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हा भारताचा अगदी छोटा भाग आहे, हे लोक भारताचं प्रतिनिधित्व करतात असं म्हणता येणार नाही.

बातम्यांवरच्या विश्वासाचं सरासरी प्रमाण जगभरातच वाढलं आहे. भारतातले केवळ ३८ टक्के लोक म्हणाले की त्यांना ऑनलाईन बातम्यांवर पूर्णपणे विश्वास आहे. भारतात अजूनही सगळ्यात जास्त विश्वास वर्तमानपत्र आणि सरकारी बातम्यांवरच आहे. बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत फिनलँडचा पहिला नंबर लागतो तर अमेरिका विश्वासार्हतेच्या बाबतीत सर्वात खाली आहे.