देशातील करोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक संख्येने वाढले. गेल्या चोवीस तासांमध्ये ८,१७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या एक लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. करोनाबाधितांच्या संख्येत आठवडय़ापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.

गेल्या २४ तासांत देशात २०४ जण करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार ५९८ जणांचा बळी गेला आहे. समाधानकारक बाब म्हणजे देशात ९५ हजार ५२६ जणांनी करोनाचा पराभव केला आहे. तर ९७ हजार ५८१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. १८ मे रोजी हे प्रमाण ३८.२९ टक्के होते.आतापर्यंत ३८ लाख ३७,२०७ नमुना चाचण्या झाल्या असून दररोज एक लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे.