भारत-चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्यापही तणाव कायम आहे. भारतीय लष्कर या ठिकाणी सातत्याने आपली स्थिती अधिक मजबूत करीत चिनी सैनिकांच्या घुसखोरीला सडेतोड उत्तर देत आहे. त्यातच आता भारतीय लष्करानं पँगोंग त्सो तलावाच्या किनाऱ्यावरील फिंगर ४ भागातील उंच जागेवर आपला ताबा मिळवला असून चीनविरोधातील आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे.

लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि चीनमध्ये आज पूर्व लडाखमध्ये ब्रिगेड कमांडर आणि कमांडिंग ऑफिसर स्तरावरील चर्चा पार पडली. या चर्चेचा उद्देश दोन्ही देशांमध्ये चर्चेचं माध्यमं कायम रहावं असा होता. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पँगोंग त्सो तलावाच्या दक्षिणेकडे उंचीच ठिकाण व्यापून ठेवण्यासाठी मोहिम आखण्यात आली होती. त्या योजनेनुसारच भारतीय लष्कराने आज ही मोहिम फत्ते केली आहे.

नेमका वाद काय आहे ?

चीनच्या दादागिरी, वर्चस्व गाजवण्याच्या सवयीमुळे पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या हद्दीमध्ये रस्ता बांधणीचे काम करतोय, पण ते चीनला मान्य नाही. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. पँगोंग त्सोमध्ये तलावाच्या उत्तरेला भारताकडून रस्ता बांधणीचे काम सुरु आहे. त्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. चीन दावा सांगतो तिथून बऱ्याच लांब अंतरावर हे काम सुरु आहे. चीनने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये रस्ता बांधला मग, आम्ही आमच्या भागामध्ये रस्ता बांधू शकतो अशी भारताची भूमिका आहे.