असिहष्णुता ही भारतीयांच्या जीवनशैलीचा भागच बनली आहे. भारतीयांच्या जगण्यात नेहमीच ती डोकावत असून आपल्याला तिची जाणीव नसेल तर तो आपला मुर्खपणा असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि नीती आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांनी व्यक्त केले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विवेक देबरॉय यांनी सध्याच्या सरकारवर होणारा असहिष्णुतेचा आरोप निरर्थक असल्याचेही सांगितले.
तुम्ही मला असहिष्णुता वाढत आहे असे सांगत असाल तर माझे म्हणणे एवढेच आहे की हा मुद्दा पूर्णपणे वैयक्तिक मतांवर आधारित आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे. त्यामुळे याबाबत वाद घालणे योग्य ठरणार नाही, कारण असहिष्णुता वाढत असल्याचा कोणताही ठोस असा पुरावा उपलब्ध नाही. केवळ काही निदर्शकांच्याआधारे असहिष्णुतेचे मोजमाप केले जाते. यापैकी जातीय हिंसा, इंटरनेट स्वातंत्र्य अशा निदर्शकांकडे पाहिल्यास मला वाटत नाही, की देशातील असहिष्णुता वाढली आहे, असे मत विवेक देबरॉय यांनी व्यक्त केले. बौद्धिक वर्तुळात तर कायमच असहिष्णुता होती. त्यामुळे असहिष्णुता वाढत असल्याच्या नावाने गळा काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.