संसदेतील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी पेगॅसस प्रकरणावरून जोरदार गोंधळ झाला. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत बाजू मांडण्यास उभे राहिले. तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकला. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोलताही आलं नाही. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री वैष्णव बोलायला उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वंकैय्या नायडू यांनी विरोधकांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना आपलं वक्तव्य सदनाच्या पटलावर ठेवण्याची विनंती केली. “खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही असंच दिसतंय.”, असं मत वंकैय्या नायडू यांनी मांडलं. गोंधळामुळे शून्यकाळ आणि प्रश्नकाळही चालू शकलेला नाही. “विरोधी पक्षातील काही जण, विशेषत: तृणमूल काँग्रेसचे खासदार उठले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा्या हातातून पेपर घेतला आणि तो फाडून टाकला. असं वागणं खरंच दुर्दैवी आहे.”, असं मत भाजपा राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी नोंदवलं आहे.

“जर काही जणांनी मंत्र्यांच्या हातून पेपर खेचून तो फाडला असेल, तर ते दुर्दैवी आहे. मी राज्यसभेत उशिरा पोहोचलो. त्यामुळे मी बघू शकलो नाही”, असं मत समाजवादी पार्टीचे खासदार राम गोपाल यादव यांनी नोंदवलं.

“मंत्र्यांचं वागणं दुर्दैवी होतं. राज्यसभेच्या गदारोळात आयटी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने बाजू मांडली ती चुकीची होती. सरकारला फक्त प्रकरणाची खिल्ली उडायवची असं दिसतंय”, अशी टीका राजदचे खासदार मनोज झा यांनी केली आहे.