भाजपाने हरयाणात घोडेबाजार करु सत्ता मिळवली. महाराष्ट्रात मात्र आम्ही त्यांना रोखले. आता झारखंडमध्येही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. काँग्रेस-जेएमएम आघाडी झारखंडमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी व्यक्त केला. झारखंडमध्ये निकालाचे जे आकडे दिसतायत तो सरकारच्या धोरणांविरोधातील कौल आहे असे सातव म्हणाले.

लोकांचा विचार न करता, तुम्ही जर स्वत:चा विचार करत असाल तर जनताही तुम्हाला स्वत:च्या ‘मन की बात’ सांगेल असे सातव यांनी सांगितले. झारखंडमध्ये प्रचारात भाजपाने सुधारित नागरिकत्व कायदा, कलम ३७०, एनआरसी, राम मंदिर अशा राष्ट्रीय मुद्दांवर भर दिला होता. विधानसभा निवडणुकीत राज्यातील स्थानिक मुद्दांवर बोलावे लागते असे सातव म्हणाले.

आपले सरकार आणण्यासाठी भाजपाने गोवा, मणिपूरसारखा प्रयोग केला, तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? यावर सातव म्हणाले की, “भाजपा काय करु शकते याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही भरपूर अनुभव घेतला आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सर्तक आहोत.” काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी निश्चित सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यांना गृहित धरु नका हाच झारखंडच्या निकालाचा संदेश आहे असे राजीव सातव म्हणाले. झारखंडमध्ये काँग्रेस, जेएमएम आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. झारखंडमध्ये सध्या भाजपाचे सरकार आहे. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही भाजपाला मोठा पक्ष ठरुनही विरोधी पक्षात बसावे लागू शकते. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची आघाडी आहे.

झारखंडमध्ये घड्याळाचा गजर होणार? राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर
झारखंडमध्येही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते कमलेश कुमार तिवारी हे हुसैनबाद विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाचे संजय कुमार सिंग यादव, आपचे कन्हैया विश्वकर्मा हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.