झारखंडमधील चाईबासा येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान घालण्यात आले आहे. घटनास्थळावरुन सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे.

सिंहभूम जिल्ह्याच्या पश्चिमेकडील खूंटी- चाईबासा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक झाली. या भागात नक्षलींविरोधात सुरक्षा दलांनी अभियान राबवले होते. शोधमोहीम सुरु असताना दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही नक्षलींना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एकूण पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यातील तीन नक्षलींचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांना २ एके ४७, २ पिस्तूल आणि एक ३०३ रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

झारखंड पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा नक्षलीविरोधात मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी टूटी झरना आणि लालगढ येथील जंगलातून बिहारी मांझी उर्फ बिहारी महतो या नक्षली कमांडरला अटक केली. या नक्षलवाद्यावर एक लाख रुपयांचे इनाम होते.