केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पुरग्रस्त जम्मू-काश्मिरमध्ये ‘बीएसएनएल’च्या सेवेचा वापर करणाऱ्या मोबाईलधारकांना आठवडाभर मोफत टॉकटाईम पुरविण्यात येणार असल्याची घोषणा केली. जम्मू-काश्मिरमध्ये असणाऱ्या १२,३०६ मोबाईल टॉवरपैकी ६,८११ टॉवर पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या भागातील ८० टक्के संदेशवहन यंत्रणा कोलमडली होती. त्यापैकी १,२०८ टॉवरची सेवा पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, या भागातील सध्याची स्थिती पाहता येत्या आठवडाभर काश्मिर खोऱ्यातील ‘बीएसएनएल’ नेटवर्कधारकांना मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय खाजगी टेलिकॉम कंपन्यांनादेखील मोफत सेवा पुरविण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीवरून खाजगी कंपन्यांनीही या भागातील मोबाईलधारकांना दिवसभरात ६० मिनिटांसाठी मोफत सेवा पुरविण्याच निर्णय घेतला. पुंछ वगळता काश्मिर खोऱ्यातील लँडलाईन आणि मोबाईल सेवा बऱ्याच प्रमाणात पूर्वपदावर आणण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली.