केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून हे शेतकरी दिल्ली सीमेवर निषेध आंदोलन करत आहेत. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतचं एक ट्विट चर्चेत आलं असून सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

या आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

कंगनाने या आजीसंदर्भात ट्विट केल्यानंतर ते चुकीचं असल्याचं ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं. तसंच त्यात करण्यात आलेले दावेदेखील खोटे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, कंगना कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. यापूर्वीदेखील कंगनाने अनेकदा ट्रोलर्सला सामोरी गेली आहे. केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचं जाहीर करत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे कायदे पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदे लागूही करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या कायद्यांना देशातील काही भागातील शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. विशेषतः पंजाब हरयाणात या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.