'ये दिल मांगे मोअर' हे आपल्याला एका शीतपेयाच्या कंपनीची टॅगलाईन म्हणून माहित आहे. पण या टॅगलाईनसाठी आणखी एक व्यक्ती ओळखली जाते, ती म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. कारगिल युद्धातील आपली कामगिरी पार पाडून बत्रा आपल्यासोबतच्या जखमी झालेल्या सैनिकांना घेऊन येत होते. त्यावेळी शत्रूने केलेल्या हल्ल्याचे ते लक्ष बनले. शत्रूच्या एका गोळीने अखेर देशाचा हा जवान शहीद झाला. अवघ्या २४ व्या वर्षी हा तरुण सैनिक आपल्या साथीदारांना प्रेरणा देत होता. इतक्या लहान वयात देशासाठी प्राण देणाऱ्या या तरुणाची कहाणी हृदय हेलावून टाकणारी अशीच आहे. चंदीगढमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलेल्या बत्रा यांनी इंडियन मिलिट्री अकादमीमध्ये प्रवेश घेतला. लेफ्टनंटपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास त्यांना कारगिल युद्धातील कॅप्टन पदापर्यंत घेऊन गेला. कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला. शहीद झालेल्या कॅप्टन बत्रा यांना हाँगकाँग येथे मर्चंट नेव्हीमध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळत होती. मात्र ही संधी नाकारत त्यांनी भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला होता. युद्धाच्या दरम्यान कॅप्टन बत्रा शत्रूचा सामना करण्यासाठी स्वत:ला सज्ज करत होते. त्यावेळी बत्रा यांचे कमांडिंग ऑफीसर असलेल्या लेफ्टनंट कर्नल वाय.के.जोशी यांनी शेरशाह असे त्यांचे सांकेतिक नाव ठेवले. हे नाव पुढे पाकिस्ताननेही वापरण्यास सुरुवात केली. कॅप्टन बत्रा यांच्यासोबत युद्धभूमीवर असणाऱ्या जवानांच्या म्हणण्यानुसार, कॅप्टन बत्रा हे एक अतिशय उत्तम योद्धा होते. पॉईंट ५१४०, पॉईंट ४७५०, पॉईंट ४८७५ ही ठिकाणी शत्रूच्या तावडीतून काबीज करण्यात बत्रा यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपली कामगिरी सिद्ध केल्यानंतर विक्रम बत्रा आणि त्यांचे सहकारी ये दिल मांगे मोअरचा गजर करायचे. त्यामुळे युद्धभूमीवर सगळीकडून हा एकच नारा ऐकू येत होता. ७ जुलै १९९९ रोजी पॉईंट ४८७५ याठिकाणी असलेल्या शत्रूच्या सैन्याला बत्रा यांनी ठार केले. मात्र त्याचवेळी भारतीय सेनेतील हा शूर योद्धाही शहीद झाला. 'जय माता दी' हे कॅप्टन बत्रा यांचे शेवटचे शब्द ठरले.